Sunday, July 10, 2016

नियम, कायदे पाळणे सर्वांचे कर्तव्य

नियम, कायदे पाळणे
सर्वांचे कर्तव्य
वाहतूक खात्याच्यावतीने शुक्रवारी रस्ता सुरक्षा मोहीम राबविण्यात आली. पणजी आणि मडगाव शहरासह डिचोली, वाळपई, म्हापसा, वास्को, फोंडा आदी ठिकाणी पोलिसांनी ही मोहीम कडकपणे राबवली. याबद्दल वाहतूक विभागाचे कौतुक करावेच लागेल. पोलिसांनी हेल्मेट न घातलेल्या तब्बल 5 हजार 179 दुचाकीस्वारांवर कारवाई करून दंड वसूल केला. वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांवर वचक बसावा तसेच नियमांविषयी जागृती व्हावी असाच हेतू अशा मोहिमांमागे असतो, पण पोलिसांच्या कारवाईचा परिणाम फारसा होताना दिसत नाही. हेल्मेट न वापरणे, सीट बेल्ट न लावणे, गतीवर नियंत्रण न ठेवणे, मोटारींना गडद रंगाचे फिल्मिंग करणे, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे अशा गोष्टी नित्याच्या झाल्या आहेत. काही वर्षांपूर्वी पोलिसांनी फिल्मी स्टाईलमध्ये वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांना चॉकलेट देण्याचा उपक्रम राबविला होता, पण नियम तोडण्यात धन्यता मानणारे दंड करा किंवा चॉकलेट द्या आम्ही असेच राहू असा इशारा देतात. पोलिसांनी दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाई केली पण हेच पोलिस आलिशान कारचालकांवर कारवाई करताना दिसत नाहीत. अनेक चारचाकीचालक विशेषत: श्रीमंत वर्गातील लोक वाहतूक पोलिसांना जुमानत नाहीत. पोलिसांनी एखादेवेळेस कारवाई केल्यास पोलिसांनाच दादागिरी केली जाते. मी कोण आहे माहीत आहे का, अशा शब्दात सुनावले जाते. प्रसंगी राजकीय नेत्यांना फोनाफोनी करून कारवाई करणाऱ्या पोलिसांवर दबाव आणला जातो. कारच्या काचांना गडद रंगाची फिल्मिंग करून सर्वोच्च न्यायालयाचे आदेशही धुडकावले जातात. पोलिसांच्या कचखाऊ धोरणामुळे मग आम्ही वाहतुकीचे नियम का पाळावे, असा प्रश्‍न दुचाकीस्वारांच्या मनात निर्माण झाल्यास नवल नाही. आम्हाला एक आणि श्रीमंतांना एक असा न्याय का, असेही अनेकदा विचारले जाते. यावर कोणीही काही उत्तर देऊ शकत नाही. खरे तर एक जबाबदार नागरिक म्हणून वाहतुकीचे नव्हे सार्वजनिक ठिकाणचे सर्वच नियम आणि कायदे पाळणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य ठरते. केवळ पोलिसांना जबाबदार न ठरवता सामाजिक बांधिलकी म्हणून सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावेत. कारण एका चुकीमुळे केवळ आपलाच नव्हे, तर दुसऱ्यांचाही जीव धोक्‍यात घालत असतो. 

No comments:

Post a Comment