Sunday, July 10, 2016

तुमचे काम झालेले नाही... दोन दिवसांनी फोन करा

तुमचे काम झालेले नाही... दोन दिवसांनी फोन करा
पणजीतील माहितीघरांत सावळा गोंधळ : समन्वय आणि माहितीचा अभाव

पणजी, ता. 19 : सरकारी काम आणि सहा महिने थांब अशी एक म्हण आहे. या म्हणीची प्रचिती पणजीतील माहिती घरांमध्ये नागरिकांना येत आहे. नागरिकांना झटपट दाखले मिळावेत यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि कदंब बस स्थानक परिसरात माहिती घरांची स्थापना करण्यात आली. मात्र सात चौदाचा उतारा वगळता अन्य कोणतेही काम दिरंगाईने होत असल्याचा नागरिकांचा रोजचा अनुभव आहे.
सात चौदाचा उतारा, म्युटिशेन, जन्म - मृत्यू दाखले, खातेफोड, सर्व्हे प्लॅन आदी दाखले आणि नकाशे देण्याचे काम या माहिती घरातून होते. अर्ज केल्यानंतर संबंधित दाखला किंवा प्लॅन कधी मिळेल हे न सांगता दोन दिवसांनी फोन करा, एवढेच सांगितले जाते. नागरिकांनी याठिकाणी फोन केल्यानंतर पावती क्रमांक विचारला जातो. मग अजून आपले काम झालेले नाही. दोन दिवसांनी फोन करा, एवढेच सांगितले जाते. हे दोन दिवस कधीच संपत नाहीत, असा अनुभव नागरिकांना येत आहे.
सीआरझेडच्या 200 आणि 500 मीटर रेषा दाखवणारा सर्व्हे प्लॅनसाठी अर्ज केलेल्या एका नागरिकास तब्बल 22 दिवसांनंतर तुम्हाला अर्जंट असेल तर पैसे परत न्या... असा अनाहूत सल्ला या माहिती घरातून दिला गेला. माहिती घरांमुळे नागरिकांची कामे वेगाने आणि झटपट होत असल्याचे मुख्यमंत्री वेळोवेळी सांगतात. मात्र नागरिकांना वेगळाच अनुभव येत आहे. संबंधित दाखला किंवा नकाशा केव्हा मिळेल हे कोणीच सांगत नाही. प्रत्येकवेळी दोन दिवसांनी सांगतो, असे मोघम उत्तर दिले जाते.
या दोन्ही ठिकाणी मुलीच कर्मचारी असल्यामुळे कितीही संताप आला तरी मुलींबरोबर भांडण्यात अर्थ नाही, असे म्हणून नागरिक निघून जातात. येथील मुलींना नेमक्‍या कामाची माहितीच नसल्याचे दिसून येत आहे. शिवाय ज्या कार्यालयाशी संबंधित काम आहे, अशा कार्यालयांशी समन्वयाचा अभाव असल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. कदंब बस स्थानकावरील माहिती घरात तर या कर्मचाऱ्यांशी संवादही साधता येत नाही. याठिकाणी उघडझाप करणारी दारे बसवली आहेत. या कर्मचाऱ्यांना हवे असल्यास ते नागरिकांशी बोलतात पण नागरिकांना त्यांच्याशी बोलता येत नाही. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या माहिती घरात एकच कर्मचारी महिला असते. तिला एकटीलाच नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागत असल्याचे चित्र दिसून येते. येथील सर्व अर्ज कदंब बस स्थानकातील माहिती घरात जात असल्याने काहीवेळा नागरिकांना तिथे जाण्यास सांगण्यात येते. तिथे गेल्यानंतर अर्जाचे नेमके काय झाले याचे स्पष्ट उत्तरच दिले जात नाही.
दोन्ही माहिती घरात संपूर्ण उत्तर गोव्यातील सर्व तालुक्‍यातील लोक येतात. पेडणे, डिचोली किंवा सत्तरीतून येणाऱ्या नागरिकांना वारंवार हेलपाटे मारणे शक्‍य नसल्याने नागरिक फोन करतात. सह्या करण्यासाठी अधिकारी नाहीत, सर्व्हर बंद आहे, संबंधित लिपिक नाही, अशी जुजबी उत्तरे दिली जातात. अनेक नागरिक संताप व्यक्‍त करताना दिसतात मात्र मुलींशी वाद नको म्हणून परत जातात.
संबंधित खात्याच्या मंत्री आणि अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून येथील कारभार सुरळीत आणि खऱ्या अर्थान गतीमान करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

No comments:

Post a Comment