Sunday, July 10, 2016

प्रसिद्धीसाठी काय पण...
एखाद्या गोष्टींची सवय लागली की, त्याचे व्यसनात रुपांतर व्हायला वेळ लागत नाही. मग ते व्यसन कशाचेही असो. कुणाला कशाचे आणि कुणाला कशाचे व्यसन लागेल हे सांगता येत नाही. सध्या देशभरात अनेकांना प्रसिद्धीचे व्यसन लागले आहे. याची सुरवात दोन अडीच वर्षांपूर्वी नवी दिल्लीतील जंतरमंतरवर झाली. अर्थात आंदोलन, धरणे, मोर्चा या गोष्टी आपल्याला नवीन नाहीत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या देशव्यापी आंदोलनातून थेट मुख्यमंत्री झालेल्या अरविंद केजरीवाल यांचा आदर्श घेऊन अनेकजण आज चळवळी चालवत आहेत. जेएनयू प्रकरणातून उदयास आलेला कन्हैया आज देशभर केंद्र सरकार, भाजप आणि आरएसएसविरुद्ध भाषणे ठोकत आहे. तिकडे महाराष्ट्रात मंदिरात महिलांना प्रवेश देण्यावरून राष्ट्रीय पातळीवर चमकलेल्या तृप्ती देसाईंच्या अंगात भलतेच बळ आले आहे. कोल्हापुरची अंबाबाई, शनी शिंगणापूरचा शनी देवाचा चौथरा आणि त्र्यंबकेश्‍वरच्या मंदिरात प्रवेश झाल्यावर त्या आता मुंबईतील हाजी अली दर्ग्यात प्रवेश करण्यासाठी आतुर झाल्या आहेत. अशा आंदोलनांतून नेमकी कोणती समाजसेवा होते, हे कळायला मार्ग नाही. आपल्याकडेही वेगळी परिस्थिती नाही. एखाद्या घटकाने सरकाविरुद्ध आवाज उठवला रे उठवला की, सत्तेत नसलेले सगळेच तिकडे धाव घेतात. पुढील वर्षी विधानसभा निवडणुका असल्याने राज्यातील सगळे प्रश्‍न, समस्या आणि अडचणी आपण चुटकीसुरशी सोडवू, अशा थाटात अनेकजण पुढे येत आहेत. मग ते आम आदमी पार्टीचे लोक असोत किंवा कॉंग्रेसचे नेते. विषेशत: तरुणांमधील रक्‍त प्रमाणापेक्षा जास्तच सळसळत असल्याचे दिसून येत आहे. अनेकदा मूळ समस्या बाजूलाच पडते आणि किंवा तशीच राहते मात्र आंदोलन आणि त्यावरील राजकारण सुरूच राहते. मग पेडण्यापासून काणकोणपर्यंत सर्वच ठिकाणी हे प्रसिद्धीपिपासू लोक पोहोचतात आणि सरकारविरुद्ध शड्डू ठोकतात. या लोकांना कोणताही विषय वर्ज्य नसतो. प्रश्‍न कोणताही असो अगदी किंवा समस्या असो, हे लोक शक्‍तिमान किंवा बालवीरसारखे धावून येतात आणि लोकांना दिलासा देतात. आपण करत असलेल्या प्रत्येक आंदोलनाची दखल प्रसारमाध्यमांनी घ्यावी, याकडे त्यांचे कटाक्षाने लक्ष असते. फेसबूक, ट्विटर यांचाही हे लोक लीलया वापर करताना दिसतात. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी येऊन गेले की, मग अशा आंदोलनाचे काय पुढे जे व्हायचे तेच होते. कन्हैया किंवा तृप्ती काय अनेकांचे असेच सुरू आहे. अडीच वर्षांपूर्वी प्रसारमाध्यमांत 24 तास झळकणारे केजरीवाल आज कुठे आहेत, याचाही बोध या लोकांनी घ्यायला हवा.
अशोक ढेरेकर

No comments:

Post a Comment